सुदर्शन चक्र शिशुपालाचे शर संधान केल्यावर कृष्णकडे परतत असताना कृष्णाच्या बोटाला छोटीशी जखम करून गेलं. जखम ही इतकी खोल की रक्ताची धार थांबेचना, शेवटी सुदर्शन चक्राचा वार तो, साक्षात प्रभूंवर झाला म्हणून काय त्याची तीव्रता कमी थोडीच होणार! राजवैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप धावपळ केली, लेप उगाळले, काढे पाजले पण तरीही काहीही उपयोग होईना, शेवटी नारद मुनी तिथं आले, म्हणाले प्रभू ही कुठली लीला तुमची. सारे उपाय थकले आता आपणच उपाय सांगावा. कृष्ण म्हणाला अरे नारदा लीला कसली त्यात, एक साधी जखम तर आहे होईल बरी आपोआप, त्याच एवढं काय घेऊन बसलात. नारद म्हणतात प्रभू जो विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून अहोरात्र झटतो आहे त्याच्या जखमेतून रक्ताची संतत धार वाहते आहे, त्या प्रभूला वेदना होत आहेत व आम्ही काहीच करायचे नाही म्हणता हे कसं शक्य होईल, कृपया उपाय सांगावा, केवळ आपणच यावर उपाय जाणता व यामागे आपली काहीतरी लीला असावी हे मी जाणून आहे.
नारदमुनी ऐकेचना तेव्हा शेवटी कृष्ण म्हणाला ठीक आहे नारदा ऐक तर उपाय, सुभद्रेच्या घरी जा व तिला म्हणावं तुळशीचा लेप दे, व तो लेप बोटाला बांधायला एक चिंधी दे, तिथं जर काम झालं नाही तर मग द्रौपदी कडे जा.
नारदमुनी सुभद्रेकडे गेले, लेप व चिंधी मागितली, सुभद्रेने दासींना आज्ञा केली की तुळशीचा रस काढा. तुळशीच्या रसाचा लेप तर तयार झाला, त्याला रत्नजडित सोन्याच्या भांड्यात ठेवण्यात आलं व नारदामुनींकडे सुपूर्त करण्यात आलं, नारद मुनी म्हणाले सुभद्रे अग लेप तर छान दिलास पण चिंधी कुठाय? सुभद्रा म्हणते अहो मुनिवर दासींनी खूप शोधलं पण माझ्या एवढ्या भरजरी वस्त्रालयात चिंधी कुठून मिळावी? नारदमुनी मनातल्या मनात हसले, प्रभूंची लीला त्यांना आता उमगली होती, सुभद्रेचा निरोप घेऊन तिचा लेप न घेताच लगबगीने ते द्रौपदी कडे रवाना झाले, नारद मुनींनी मागणी करायचा अवकाश द्रौपदी ने त्वरित स्वतः तुळशीच्या पानांचा रस काढून लेप तयार केला, व पांडवांनी तिला भेट दिलेला त्रिभुवनातील सर्वाधीक किमतीचा असलेल्या शालुचा पदर फाडून त्याची चिंधी बनवताना शालू फुकट जाइल हा विचार देखील तिच्या मनाला शिवला नाही, मनात विचार होता केवळ आणि केवळ कृष्णाला लवकरात लवकर बरं कस वाटेल हा, असा लेप व चिंधी कृष्णाच्या बोटाला लावून त्याची रक्ताची धार तर लगेच थांबलीच, व जखम देखील भरून आली. या चिंधी चे मोल मी एक दिवस नक्की चुकवीन असे कृष्ण म्हणता झाला, व वस्त्रहरण होताना त्याच करंगळी तुन द्रौपदी ला वस्त्र पुरवीत राहिला.
रक्ताच्या नात्या पेक्षा ही कधी कधी मानलेली नाती अधिक जवळची ठरतात, जेव्हा नात्यात व्यवहार डोकावत नाही, फायदा तोटा यांचे गणित आड येत नाही, बेधडक जे काही करायचं ते केलं जातं, ती नाती खरी, बाकीचे फक्त व्यवहार. अशा नात्यांनी शरीराच्या जखमा भरल्या जातातच पण मनावर झालेले असंख्य वार ही या नात्याच्या एका फुंकरीने बरे होतात.
*चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.*
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.* #रक्षा बंधन