Kalpataru's kreations
1K views • 1 months ago
#🌷संत गजानन महाराज पुण्यतिथी🙏आज ऋषीपंचमी, संतश्रेष्ठ ब्रह्मांडनायक भक्तप्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज ह्यांची ११५ वा संजीवन समाधी दिवस !!आणि कलावती आई ह्यांचा ११७ वा जन्मोत्सव त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन. 🙏
गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता.
‼️"गण गण गणात बोते,"‼️
हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे,
"मना समजे नित्य |
जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
#अशी_घेतली_श्रींनी_समाधी_❗
शके १८३२ अर्थात ८ सप्टेंबर १९१० ऋषीपंचमी या दिवशी गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली.i
शेगाव संस्थान त्यांच्यामुळेच नावारूपाला आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या शेगाव येथील गजानन महाराजांना जन्म कधी झाला हे कोणालाही माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षी म्हणजे १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला शेगावात दिसले. साधक वर्ग ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि ऋषीपंचमी हा दिवस संजीवन समाधी उत्सव म्हणून पाळला जातो.
जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार
समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटलं जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला.
समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||" लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते.
तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळवि
श्रींनी समाधी घेण्या पूर्वीच , श्रींचे समाधी मंदिर तयार होते .कारण श्रींचे पट्टशिष्य श्री भास्कर महाराज यांनी सन १९०७ मध्येच आपली शेवटची इच्छा सांगून, शेगावला श्रींच्या मंदिरा करीता भक्तां कडून शपथ घेतली होती .( ग.वि.अ.११) म्हणून भक्तांनी श्रींचे पट्टशिष्य श्री भास्कर महाराजांच्या इच्छेनुसार , श्रींचे समाधी पूर्वीच त्यांचे भव्य दिव्य असे समाधी मंदिर पूर्वीच तयार केले होते .सर्वांनी समाधी मंदिरात श्रींचा जयजयकार केला .
समाधी घेण्याच्या १ दिवस आधी चतुर्थीला महाराज भक्तांना म्हणाले “गणेश पुराणात कथा आहे की चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन करून दुसरे दिवशी विसर्जन करावा, त्याप्रमाणे भक्तहो तुम्ही या पार्थिव देहाला विसर्जित करण्याची वेळ आली आहे. यत्किंचित दुःख करू नका कारण तुम्हा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आम्ही इथेच राहणार आहोत. भक्तहो तुमचा कदापि विसर पडणार नाही.” महाराज पुढे म्हणाले “शरीर हे वस्त्रापरी आहे आणि त्याला बदलणे गरजेचे आहे असे भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे”. दुसरे दिवशी ऋषिपंचमीला सकाळी ८ च्या दरम्यान पद्मासनात स्थिर होऊन प्राण रोधून मस्तकी धारण केला आणि मुखातून शब्द आले “जय गजानन”!
डोणगांवचे गोविंदशात्री यांच्या सांगण्यानुसार समाधी घेतल्यावर श्रींचे अंग गार झाले आहे का हे तपासण्यासाठी श्रींच्या डोक्यावर लोण्याचा गोळा ठेवण्यात आला आणि काय आश्चर्य तो गोळा वितळू लागला म्हणजेच अंग गार झाले नव्हते. शास्त्री म्हणाले “एक दिवस काय, या समाधी स्थितीत महाराज वर्षभर आणि पुढे असेच निःसंशय राहू शकतात, पण असे करणे अनुचित होईल तरी सर्व भक्त आले की स्वामींना समाधी देऊयात”. भक्तांनी हे वचन शिरोधार्य केले. महाराजांची समाधी ही संजीवन आहे म्हणजेच देह सोडला तरी प्राण मस्तकी धारण केलेले आहेत.
अपार भक्तांचा मेळा शेगांवला जमला,७२ दिंड्या आल्या, रस्ते सारवासारवी करून सुशोभित करण्यात आले. नक्षीदार रांगोळ्या काढल्या गेल्या, दुतर्फा दीपोत्सव केला गेला. समाधी अवस्थेतील पद्मासनस्थित श्रींना फुलांनी मढवलेल्या रथात स्थानापन्न करवून, रात्रभर मिरवणूक काढण्यात आली. महाराजांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लोक आतुर झाले होते. नानाविध खिरापती वाटल्या गेल्या. हजारो भक्त विठ्ठलाचा नामगजर – भजन यात दंग होऊन रथामागे चालत होते. तुळस, बुक्का, गुलाल आणि अनंत फुले वाहिली गेली आणि फुलांखाली महाराज जणू झाकून गेले.
श्रींचा रथ बापूना काळे यांच्या घरावरून जात असताना त्यांच्या पत्नीने लहानग्या नामदेवाला श्रींच्या पवित्र चरणांवर टेकवले. काही क्षण श्रींनी समाधी अवस्थेतून डोळे उघडून नामदेवावर कृपाकटाक्ष टाकला. या आशीर्वादामुळे नामदेवाने पुढे भरघोस यश संपादन केले. पुढे पुंडलिकबाबा भोकरे यांनीही श्रींना शेवटच्या दर्शनासाठी कळकळीची विनंती केली आणि माऊलींनी क्षणभर डोळे उघडून स्मित हास्य केले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. अशा ज्वलंत प्रसंगांवरून साक्ष पटते की श्रींची समाधी ही संजीवन समाधी आहे, केवळ भक्तीसाठी व्याकुळ असलेली ही माउली एका हाकेसरशी धावून येणारी आहे, तर काही प्रसंगी हाकेआधीच पोहोचणारी आहे.
रात्रभर थाटामाटात चाललेली मिरवणूक सूर्योदय होताच मठात परतली. श्रींच्या देहावर अखेरचा रुद्राभिषेक केला गेला. पंचोपचार पूजा आणि आरती पश्चात नामगजर केला गेला. शास्त्राप्रमाणे श्रींची मूर्ती उत्तराभिमुख आसनस्थ केली आणि भक्तांनी अखेरचे दर्शन घेतले. “जय स्वामी गजानन” च्या गजरात मीठ, अर्गजा, अबीर यांनी गार भरून त्यावर शिळा लावून दार बंद केले गेले. दहा दिवसांपर्यंत समाराधना होऊन अनेक भक्तांनी स्वामींचा प्रसाद ग्रहण केला.
समाधीनंतर एक दीड वर्षांनी हरी पाटीलांना महाराजांचा विरह सहन होत नव्हता आणि एक दिवस त्यांनी असह्य होऊन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाधीवरील शिळा सरकवली. महाराजांची दिव्य मूर्ती जणू काही नुकतीच महासमाधी घेतली आहे अशी तेजस्वी दिसत होती.
श्री गजानन विजय ग्रंथांमधील १९ व्या अध्यायातील ओवीमध्ये संजीवन महासमाधी घेण्यापूर्वी श्रींनी भक्तांना दिलेले आश्वासन पुढीलप्रमाणे:
मी गेलो ऐसे मानू नका ।
भक्तीत अंतर करू नका ।
कदा मजलागी विसरू नका ।
मी आहे येथेच ।। ३११ ।।
त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.
०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.दरवर्षी शेगाव व इतर अनेक ठिकाणी , गावोगावी श्रींचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो .आज साजरा होणाऱ्या ११५ व्या संजीवन समाधी सोहळ्या च्या निमित्ताने, श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
🌹गण गण गणात बोते 🌹
#🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #🌷ऋषीपंचमी🙏 #🌺गण गण गणात बोते..🙏 #🌺जय श्री गजानन माऊली🌺
15 likes
14 shares